आम्ही काबीज केले २००० कोटींच्या व्यवसायाचे शिखर...!
मराठवाड्याच्या जनमानसात खोलवर रुजलेल्या देवगिरी नागरी सहकारी बँकेने आजघडीला २००० कोटींच्या संमिश्र व्यवसायाचा टप्पा पार करून बँकिंग क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. बँकेने आखलेली धोरणे, तज्ज्ञ संचालक वर्गाचे मार्गदर्शन, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी दाखविलेला अढळ विश्वास या बळावरच बँकेने हे यश मिळवले आहे. बँकेचा आजवरचा हा ग्राहकाभिमुख प्रवास खूप प्रदीर्घ आणि तितकाच समाजाभिमुख राहिला.
२३ जानेवारी १९८४ रोजी स्थापन झालेल्या देवगिरी बँकेने समाजातील दुर्बल घटकांसह मोठमोठ्या उद्योग समूहांना अत्याधुनिक बँकिंग सेवा पुरवून त्यांच्या आर्थिक कामकाजात हातभार लावला आहे. गेल्या साधारण दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या चक्रात अवघे जनजीवन विस्कळीत झाले. समाजातील प्रत्येक घटकाला याची चांगलीच झळ बसली. मोठमोठे व्यावसायिक, उद्योजकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. कोरोनानंतर झालेले हे सारे परिणाम दीर्घकालीन स्वरूपाचे होते. भयानक वादळात जशी मोठी पडझड होते, होत्याचे नव्हते होते, तसाच काहीसा अनुभव कोरोना महामारीने सर्वांच्या वाट्याला आला. अशाही काळात देवगिरी बँक डगमगली नाही. ग्राहकांची थोडीशी गैरसोय झालीही असेल, पण बँकेने परिस्थितीचे सार्वत्रिक भान ठेवून आपली समाजाभिमुखता तेव्हाही जपली. कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तात्काळ अर्थसाह्य पुरविले.
देवगिरी बँकेने ग्राहकांच्या अडचणी ओळखून पाऊले उचलली. विविध कर्ज योजना आखल्या. त्यातलीच एक योजना म्हणजे आत्मसन्मान कर्ज योजना. समाजाची विस्कटलेली आर्थिक घडी नीट करण्याच्या हेतूने बँकेने विविध उपक्रम राबवले. सहज सुलभ पद्धतीने परतफेडीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला. बँकेने आजवर पारदर्शक व्यवहारातून ग्राहकांचा विश्वास जपला. बँकेत तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ झाली. देवगिरी बँकेचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे. सर्वच शाखा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बँकेने ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर देणाऱ्या ठेव योजना आखल्या आहेत. त्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. लॉकर सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता पुरविण्याचे ध्येय बँकेने साध्य केले आहे. ग्राहकांना चोवीस तास बँकिंग सेवा पुरविता यावी, यासाठी देवगिरी बँकेने कामकाजात अनेक बदल घडवून आणले. बँकेत तत्पर सेवा मिळत असल्याने विविध उद्योजक, कंपन्या, संस्था, सार्वजनिक उद्योग, व्यापारी अशा व्यावसायिकांचा कल प्रामुख्याने देवगिरी बँकेकडे असतो.
देवगिरी बँकेने २००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार करण्याची ही घटना त्यामुळेच मराठवाड्याच्या आर्थिक क्षेत्रात महत्वपूर्ण ठरते. ही वाटचाल अथक परिश्रमांतून झाली आहे. यामागे आहेत दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा केलेला अवलंब. देवगिरी बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी अद्ययावत वेबसाईटची निर्मिती केली. कॉल सेंटर उभारून ग्राहकांच्या अडचणी तात्काळ दूर केल्या. प्रत्येक बँक शाखेत BRO ची नेमणूक करून बँकिंग कामकाजाला गती दिली. बँकेच्या UPI पेमेंट सुविधेमुळे व्यवहार विलक्षण गतिमान झाले. सुरक्षित Locker सुविधेमुळे ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ झाला. अशा अनेक महत्वपूर्ण कामांमुळे देवगिरी बँकेने हे सुयश मिळवले आहे.
आगामी काळात मराठवाड्यातील विविध उद्योग, समाजघटकांना तत्पर बँकिंग सेवेच्या माध्यमातून आणखी विकसित करण्याचे देवगिरी बँकेचे ध्येय आहे. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे त्यातही आम्ही नक्कीच यशस्वी होऊत, असा विश्वास वाटतो.धन्यवाद...!